नदी शुद्धीकरणाचे 'ग्रीन ब्रिज' तंत्रज्ञान- भाग ३

28 Jun 2025 10:30:00


sanskrutik vartapatra krushi_53 
बायोकल्चर' मध्ये काय असते?

बायोकल्चरमध्ये काही एकपेशीय प्राणी (म्हणजेच प्रोटोझोआ), शेवाळे, बुरशी आणि विशिष्ट जिवाणू यांचा एक समुच्चय केलेला असतो. त्यासाठी तांत्रिक व शास्त्रीय भाषेत 'कन्सोर्शिया ऑफ बॅक्टेरिया' असे म्हणतात. यातील काही जिवाणू पाण्यातील रसायने खातात, त्यांचे विघटन करून तुटण्यास अवघड अशा रेणूंच्या साखळ्या तोडतात. त्यातून एक अन्नसाखळी सुरू होते. कारण या मृत जिवाणू किंवा त्यांच्या टाकाऊ भाग एकपेशीय प्राणी (प्रोटोझोआ) खातात. तसेच मृत होणाऱ्या जिवाणू किंवा एकपेशीय प्राण्यांवर जगणाऱ्या बुरशी वाढतात. त्यांचे विघटन होत असताना त्यात शेवाळांचीही वाढ होत असते. पुन्हा या प्रकारचे शेवाळ जिवाणूंचे खाद्य म्हणून उपयोगी असते. या जिवाणूंवर जगणारे छोटे मोठे कीटक व अन्य अन्नसाखळी वाढत जाते. अन्न साखळीत घटकांची जागा बदलू शकते. जिवाणू म्हटले जाहिरातींमुळे आपल्या मनात विनाकारण नकारात्मक भावना तयार होते. पण निसर्गामध्ये ९० टक्के जिवाणू माणूस व निसर्गासाठी उपयुक्त आहेत, हे लक्षात ठेवावे. ते निसर्गातील जवळजवळ सर्वच घटकांचे (अगदी घातूंचेही) विघटन करतात. त्यामुळे निसर्गातील निर्मिती, जन्म, मृत्यू, विघटन यांचे एक संतुलन राखले जाते.

वनस्पतींच्या मुळाभोवती राहून झाडांना मातीतून अन्न उपलब्ध करण्याचे कामही जिवाणूच करतात. अगदी वर पानांसोबत राहून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्येही मोलाची मदत करणारे जिवाणू आहेत. म्हणजे वनस्पतीच्या जगण्यामध्ये, अन्न निर्मितीमध्ये जिवाणू महत्त्वाचे आहे. अन्नसाखळीची सुरुवात जिवाणूंपासून होऊन ती मोठमोठ्या भक्षक प्राण्यांमध्ये विस्तारते, एवढे लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे.

प्रदूषण म्हणजे नेमके काय?
 
प्रदुषणातील रसायनांमुळे याच तळातील सूक्ष्मजीवांच्या अन्नसाखळीची विल्हेवाट लागते. या अन्नसाखळीचे असंतुलन म्हणजे प्रदूषण असेही उलटे म्हणता येईल. ही बाब जमीन, पाणी, हवा आणि अन्न या सगळ्या प्रदूषणाला लागू होते. कारण निसर्ग रचना नेहमी संतुलनाकडे प्रवास करत असते. त्या दिशेनेच सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया चालतात. पाणी प्रदूषित होते म्हणजे काय, तर तेही इकॉलॉजिकल टॉक्झिसिटी वाढते. पाण्यातील या सूक्ष्मजीवांच्या वसाहती विस्कळित होतात. त्यातून सारेच असंतुलित होत जाते.

सृष्टी तंत्रज्ञान नक्की काय करते ?

ज्यात सुधारणा करायची आहे, तिथे त्या त्या स्थानिक स्थितीनुसार योग्य अशी सूक्ष्मजीवांची वसाहत आणि एकूणच अन्नसाखळी पुनर्प्रस्थापित करण्याचे काम सृष्टी तंत्रज्ञानाद्वारे केले जाते. ही पुनस्र्थापित केलेली इकोसिस्टीम पुढे स्वतःला संतुलित करण्याचे काम करते. पर्यावरणातील विषारी घटक कमी करण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी त्या त्या रसायनांमध्ये वाढणारे, त्यांचे विघटन करणारी जिवाणू समुच्चय तिथे वाढवले जातात. प्रदूषित पाण्यातील रसायनांचे काही रेणू कमी गुंतागुंतीचे तर काही रेणू खूप गुंतागुंतीचे असतात. जास्त गुंतागुंतीची रचना असलेल्या घटकांना 'हेवी मेटल्स' म्हणतात. पण जवळजवळ सर्वच रेणूमध्ये नायट्रोजन (N), हायड्रोजन (H), ऑक्सिजन (O), कार्बन (C) हेच घटक असतात. यांच्या विविध संरचनेतील साखळ्या व त्यातील बंध तोडण्याचे काम जिवाणू करतात. हीच त्यांची मुख्य भूमिका. कठीण गुंतागुंतीच्या रेणूंच्या साखळ्या तुटल्यानंतर कमी गुंतागुंतीच्या रेणू तयार होत त्यांचे विघटन सुरू होते. या प्रत्येक टप्प्यावर विघटन करण्याचे काम जिवाणू करतात. त्यांना जोपर्यंत खाद्य उपलब्ध आहे, तोपर्यंत त्यांची वाढ होत राहून विघटनाचे काम वेगाने होत राहते. दूषित पाण्यातील घटक जसे बदलत जातात, तसे जिवाणूंचे प्रकारही बदलले जातात. प्रवाहाच्या प्रमाणानुसार जिवाणूंची संख्या किंवा कल्चरचे प्रमाणही ठरवले जाते.

यात एक महत्त्वाचे पथ्य पाळावे लागते, ते म्हणजे त्यात प्लॅस्टिक किंवा अन्य घन कचरा येऊ न देण्याचे. यातील विघटनाच्या प्रक्रियेत तयार होणारा ऑक्सिजन व बॅक्टेरिया समुब्बयाच्या श्वसनातून येणारा ऑक्सिजन पाण्यात विरघळत राहतो. त्या विषयी बोलताना सायली जोशी नेहमी आपल्या शरीरातील किडनीचे उदाहरण देतात. त्यांच्या मते, बायोरिमिडियल पद्धती हो जणू किडनीला कार्यक्षम करण्यासारखे आहे. पुढील शुद्धीकरणाचों प्रक्रिया आपोआप होत राहते. त्याऐवजी सिवेज ट्रीटमेंट किंवा इफ्युलंट ट्रिटमेंट प्लांट हे डायलिसिस केंद्रासारखे काम करतात.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८, (लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या 'अभिनव जलनायक' या पुस्तकाचे लेखक आहेत.)
समाप्त

ऍग्रोवन १३/६/२५
Powered By Sangraha 9.0