समुद्रयान

21 Jun 2025 10:30:00

21.06.2025SANSKRUTIKvARTAPATRAVIDNYAN
 
 
चंद्रयान, आदित्य L1 आणि गगनयान या भारताच्या अंतराळ मोहिमांसारखाच भारताचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.आजवर फारच थोड्या देशांना समुद्रात एवढ्या खोलवर माणसांना पाठवता आलं आहे. त्यामुळे समुद्रयान मोहीम यशस्वी ठरली तर भारत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन या देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल.चेन्नईतल्या नॅशनल इन्स्टट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी अर्थात NIOTनं या प्रकल्पाची आखणी केली असून या मोहिमेला इस्रोचाही हातभार लागला आहे.समुद्रात सहा किलोमीटर खोलवर जाऊन अभ्यास करणं, तिथल्या जैवविवधेतची पाहणी करणं आणि तिथे असलेल्या साधनसंपत्तीचा भारताच्या विकासासाठी उपयोग करणं, असा साधारण या मोहिमेचा उद्देश आहे.समुद्रयान काय आहे?
समुद्रयान प्रकल्प हा भारत सरकारच्या डीप ओशन मिशन या खोल महासागराच्या अभ्यासासाठीच्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
NIOT ही डीप ओशन मोहीम राबवत असून त्यावर एकूण ४०७७ कोटी रुपयांचा खर्च होईल.

या मोहिमेअंतर्गत NIOTनं याआधी डिसेंबर २०२२ मध्ये सागर निधी नावाचं जहाज मध्य हिंदी महासागरात पाठवलं होतं.या जहाजावरील OMe ६००० AUV (ओशन मिनरल एक्सप्लोरर) या रोबॉटिक पाणबुडीनं ५२७१ मीटर खोलवर जाऊन तिथे मँगनीज खनिजाचा शोध घेतला होता.

आता याच मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात तिघा भारतीयांना घेऊन एक छोटी स्वयंचलित पाणबुडी म्हणजे सबमर्सिबल महासागरात खोलवर जाईल. या प्रकल्पाला समुद्रयान म्हणूनही ओळखलं जातं. समुद्रयान मोहिमेविषयी प्राथमिक विचार २०१९ पासूनच सुरू झाला होता. २०२० मध्ये त्यावर काम सुरू झालं आणि २०२५-२६ पर्यंत पाणबुडी प्रत्यक्षात खोलवर समुद्रात पाठवली जाणार आहे.

मत्स्य ६००० नाव अशासाठी कारण ही पाणबुडी समुद्रात सहा हजार मीटर (सहा किलोमीटर) खोलवर जाणार आहे. सहा किलोमीटर खोलवर पाण्याचा दबाव सहाशेपट जास्त असतो. तो सहन करता यावा यासाठी टायटेनियमच्या मिश्रधातूचा वापर करून ही पाणबुडी उभारण्यात आली आहे. २.१ मीटर व्यासाच्या या पाणबुडीत एक ऑपरेटर आणि आणखी दोघे अशी तीन माणसं एकावेळी बसू शकतात.

ही एक स्वयंचलित पाणबुडी असून ती पाण्याखाली १२ तास राहू शकेल.
पण आपात्कालीन स्थितीचा सामना करता यावा, यासाठी या पाणबुडीत ९६ तासापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या तिरअनंतपूरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या सहाय्यानं ही पाणबुडी विकसित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या पाणबुडीच्या तपासण्या सुरू आहेत.

समुद्रयान मोहीम का महत्त्वाची?

समुद्रात निकेल, कोबाल्ट, मँगनीज, हायड्रोथर्मल सल्फाईड आणि दुर्लभ खनिजांचा शोध घेण्यात ही उपकरणं मदत करतील.

त्याशिवाय या भागातल्या सागरी प्रवाह आणि जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनंही ही मोहीम महत्त्वाची मानली जाते आहे.

समुद्रयान मोहिमेद्वारा भारत आपली सागरी तंत्रज्ञानातली क्षमता सिद्ध करू शकेल. तसंच समुद्राविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठीही या मोहिमेनं मदत होईल, अशी आशा केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं व्यक्त केली आहे.

बीबीसी
 
Powered By Sangraha 9.0