भारताच्या खेळणी निर्मितीने जगभरात आज स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. भारतातून होणारी 'खेळणी निर्यात' २३९ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात भारताच्या आयातीत ५२ टक्क्यांनी घट झाली आहे. यासोबतच जागतिक खेळण्यांच्या बाजारपेठेतील चीनचे वर्चस्व कमी होत असून भारत आघाडीचा निर्यातदार म्हणून पुढे आला आहे. जगातील अनेक बड्या खेळणी कंपन्या आता चीनऐवजी भारताकडून खेळणी खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहे. मार्केट रिसर्च फर्म IMARC च्या अहवालानुसार, भारतातील खेळणी उद्योगाचे मूल्य गेल्या वर्षी १.७ अब्ज डॉलर्स इतके होते, तर २०३२ पर्यंत ४.४ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मोदी सरकारने स्वदेशी खेळण्यांना चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, ज्यामुळे भारत आज या उद्योगात पॉवर हाऊस बनला आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, देशातील खेळण्यांच्या विक्रीसाठी बीआयएसची मान्यता मिळवणे अनिवार्य आहे. जगाने स्वीकारलेल्या चीन-प्लस वन या धोरणामुळे उद्योगांची वाढ होत आहे.हॅस्ब्रो, मॅटेल, स्पिन मास्टर आणि अर्ली लर्निंग सेंटर यांसारखे जागतिक ब्रँड भारतातून खेळणी खरेदी करतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चीनवर अवलंबून न राहता भारतीय कंपन्यांकडून उचलण्यात आलेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.