टेरर फंडिंगबाबत विचारताच पाकिस्तानी नेत्यांची बोबडी वळली

14 Jun 2025 14:30:00

sanskrutik vartapatra pakistan_20 
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे. अतिरेकी कारवायांच्या समर्थनामुळे जागतिक व्यासपीठावरही पाकिस्तानी नेत्यांना जाब विचारला जात आहे. अशात भारताने अतिरेकी कारवायांविरोधात जागतिक पातळीवर सुरू केलेल्या मोहिमेची हवा काढून घेण्यासाठी विदेशांत दौरे करीत असलेल्या नेत्यांचेही पंचाईत होऊ लागली आहे. बिलावल भुत्तो यांच्या 'पाकिस्तान

पीपल्स पार्टी'च्या सिनेटर शेरी रहमान यांची इंग्लंडमधील एका न्यूज चॅनेलच्या डिबेट शोमध्ये अँकरने विचारलेल्या अडचणीच्या प्रश्नांमुळे बोबडी वळाल्याचे दिसून आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर जगासमोर भारताची बाजू मांडत पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी काही नेते विदेशांत दौरे करीत आहेत. याविरोधात कांगावा करण्यासाठी पाकिस्ताननेही त्यांचे नेते उतरविले आहेत. पाकिस्तानच्या माजी राजदूत शेरी रहमान यांना 'स्काय न्यूज'वरील चर्चेत शो होस्ट याल्दा हकीम यांनी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आसरा देण्याबाबत प्रश्न विचारला होता. 'अल कायदा', 'ब्रिग्रेड ३१३' आणि 'जैश-ए-मोहम्मद' यांच्यासह पाकिस्तानात सक्रिय असलेल्या अतिरेकी संघटनांबाबत काही सवाल उपस्थित केले होते. त्यावेळी उत्तर देताना शेरी रहमान तणावाखाली आल्या होत्या. याल्दा हकीम यांनी 'अल कायदा'शी संबंधित 'ब्रिग्रेड ३१३'ची सूत्रे पाकिस्तानातून हलविली जातात. अनेक अतिरेकी गटांची ही मध्यवर्ती संघटना आहे. हा मुद्दा मांडून अतिरेक्यांच्या फण्डिंगच्या मुद्याला हात घातला होता. याबाबत विचारले असता, शेरी यांच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलून गेले.

यावर थातुरमातूर उत्तरे देऊन शेरी यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. शेरी रहमान म्हणाल्या की, "मला माहीत नाही तुम्हाला हे कुणी सांगितले. पण अशा ऐकीव माहितीच्या आधारे भरलेली पानेच्या पाने मी तुम्हाला देऊ शकते. याचा अर्थ असा आहे की, भारतात कोणताही हल्ला झाला, तर त्याचा आळ पाकिस्तानवरच घेतला जाईल. भारतात १०० पेक्षा अधिक अतिरेकी संघटना कार्यरत आहेत. मग यासाठी पाकिस्तानच जबाबदार आहे का?"

मुं.त.भा. ११/६/२५
Powered By Sangraha 9.0