'सूत्रां'ना दिसलेली लढाई - भाग २

15 May 2025 14:30:00
 
sanskrutik vartapatra anya_45 (1)
 
 
कोणत्याही युद्धाचे वार्तांकन करताना काही किमान पथ्ये पाळायची असतात. पत्रकारितेच्या शिक्षणामध्ये ही पथ्ये आवर्जून शिकवली जातात. दर वर्षी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने संरक्षणविषयक घडामोडींचे वार्तांकन करणाऱ्या देशातील निवडक पत्रकारांसाठी विशेष अभ्यासक्रमही चालविला जातो. या निवासी अभ्यासक्रमात सैन्याच्या तिन्ही दलांचे काम कसे चालते, येथपासून भारताकडे आता नवीन कोणती शस्त्रसामग्री आली आहे येथपर्यंत अनेक प्रकारची माहिती दिली जाते. प्रत्यक्ष देशाच्या सीमेवर पत्रकारांना नेऊन तेथील जवानांशी संवादही घडविला जातो. या कालावधीमध्ये या पत्रकारांना एखाद्या लष्करी अधिकाऱ्याप्रमाणे वागविले जाते. अनेक मोठे अधिकारी त्यांच्याशी चर्चा करतात. यामध्ये थेट 'बातमी' मिळत नसली तरीही भविष्यात बातमी लिहिताना काय काळजी घ्याल, एवढी समज तयार करण्याचा प्रयत्न असतो. युद्धाच्या वार्तांकनात अगदी प्राथमिक तत्त्व पाळले जाते ते म्हणजे भक्कम दुजोरा मिळाल्याशिवाय कोणतीही बातमी प्रसिद्ध न करण्याचे! तुम्ही थेट सीमेवर जाऊन वा युद्धभूमीत जाऊन अनुभव घेत असलात तर प्रश्न येत नाही. पण कार्यालयात बसून तुम्ही बातमी देत असाल तर सरकारी सूत्रांकडून दुजोरा मिळाल्याशिवाय बातमी द्यायची नाही, हे पथ्य पाळणे आवश्यकच असते. त्याशिवाय, कोणती तुकडी कोठे नियुक्तीला आहे किंवा कोणते शस्त्रास्त्र वापरले जात आहे, याचे तपशील देऊ नयेत हा नियम पाळणेही अपेक्षित असते. आपल्या बातमीचा विपरीत परिणाम सैन्यदलाच्या समाजाच्या मनोधार्यावरिणामार किंवा पैर्यावर होणार नाही, याचेही भान बाळगणे अपेक्षित असते. युद्ध संपल्यानंतर त्यामध्ये झालेल्या चुकांची मीमांसा करणे, त्याबद्दल सरकारला जाब विचारणे याचा अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. पण पत्रकार असण्याबरोबरच तुम्ही देशाचे जबाबदार नागरिक आहात, हे तुम्ही विसरू नये, अशी अपेक्षा संरक्षण दलांची असते.
कारगिलच्या युद्धानंतर असाच अभ्यासक्रम करताना त्या वेळचे आमचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पंकज जोशी उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले होते, 'येणाऱ्या काळामध्ये माध्यमांचे महत्त्व वाढत जाईल. पूर्वी युद्ध कसे होत होते, कोठे कारवाई केली जात होती हे जनतेला फारसे कळायचे नाही. कारण तेव्हा मर्यादित साधने उपलब्ध होती. साहजिकच युद्धातील विजय आपल्या नागरिकांना कळण्यासाठी किंवा कळविण्यासाठी मोठे कष्ट घ्यायला लागायचे. पण माध्यमांच्या विस्फोटानंत परिस्थिती बदलते आहे. आपण युद्ध जिंकलो, कसे जिंकलो हे अतिशय वेगाने जनतेपर्यंत पोहचविले जाते ते माध्यमांतर्फे, ही चांगली गोष्ट असली तरीही ती अधिक जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे हेदेखील तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे.' त्यांचे ते शब्द किती सार्थ होते अनुभव गुरुवारी आला. याचा अनुभसमाजमाध्यमांवर होणाऱ्या चर्चा आणि दिली जाणारी माहिती ही विश्वासार्ह असते किंवा नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. त्याच्यावर किती अवलंबून राहायचे हे ही ठरविता येते. पण समाजमाध्यमांप्रमाणे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी वागून चालणार नाही. त्यांना आपली जबाबदारी पार पाडावीच लागेल. पाकिस्तानला धडा शिकविला जाईलच; पण त्याचबरोबर माध्यमे म्हणून वृत्तवाहिन्यांनीही आपल्या धड्यांची पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज आहे, हे नक्की.
parag.karandikar@timesofindia.com
महाराष्ट्र टाईम्स १०/५/२५
Powered By Sangraha 9.0