त्यातून सर्वांत पहिल्यांदा धिवर समाजातील त्या वेळी सर्वात जास्त म्हणजे बारावी शिकलेल्या शालू कोल्हे या महिलेची प्रशिक्षणासाठी निवड केली. तिला मुंबईतील कोरो. (CORO- कम्युनिटी रिसोर्स ऑर्गनायझेशन) या संस्थेत नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी (लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) पाठवले. ही संस्था समाजाच्या तळागाळात काम करू शकणाऱ्या महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करते. एक वर्षाच्या प्रशिक्षणामध्ये नेतृत्व, संघटन, अधिकार, जबाबदाऱ्या विषयक क्षमता बांधणी केली जाते. त्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. प्रशिक्षण घेऊन आल्यावर सौ. शालू कोल्हे यांचा आत्मविश्वास वाढला. त्या अगदी हत्तीचे बळ मिळाल्यासारख्या कामाला लागल्या. मनीष यांच्या सूचनेनुसार त्यांना धीवर समाजाच्या महिलांचा पहिला बचत गट स्थापन केला. शासकीय योजनांचा फायदा घेण्यापेक्षा संघटन आणि व्यवसायवाढ हेच मुख्य उद्देश ठेवले होते.
मच्छीमारी करणाऱ्या सर्व समाजात ६५ टक्के लोक भूमिहीन आहेत. म्हणजे मच्छीमारी हेच त्यांचे उपजीविकेचे साधन होते. तेही खूप अनियमित होते. प्रशिक्षणानंतर आत्मविश्वास वाढलेल्या शालू कोल्हे धाडस करून ग्रामसभेला गेल्या. गावाच्या इतिहासात कोणी महिला कधीही ग्रामसभेला गेली नव्हते. त्यामुळे त्यांचा तिथे अपमान झाला. पण तरीही मोठ्या धीराने त्या 'महिला अधिकारा'च्या चार गोष्टी सुनावूनच तिथून बाहेर आल्या. पुढील ग्रामसभेपर्यंत गटातील अन्य महिलांचेही धाडस वाढले. पुढील ग्रामसभेला गावातील बचत गटातील सर्व महिला हजर राहिल्या. इतक्या महिला आल्यावर पुरुष मंडळी काय बोलणार? ग्रामसभेला महिला हजर राहण्याची प्रथाच पडली. त्या ग्रामसभेमध्ये तलावातील गाळ काढण्याची मागणी नोंदीवर घ्यायला लावली. पुढे काही महिने लढा देऊन त्यांनी तलावातील गाळ काढणे हा विषय 'मनरेगा' अंतर्गत घेण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्याचप्रमाणे तलावातील गाळ यंत्रांनी न काढता मजुरांकरवी काढण्याचा नियम करून घेतला. तलाव स्वच्छतेसाठी, गाळ काढायला, माशांसाठी अपायकारक ठरणाऱ्या वनस्पती, झाडेझुडपे काढण्यासाठी गावातील शेकडो माणसांना काम मिळू लागले. त्यातून प्रत्येक घरात खेळणाऱ्या पैशामुळे सर्वांनाच आनंद झाला. नेतृत्व गुण आणि विविध क्षमता बांधणीच्या प्रशिक्षणाची ही फळे होती.
शालू कोल्हे यांच्यानंतर पुढील वर्षी सरिता मेश्राम, नंतर कविता मौजे यांनीही प्रशिक्षण घेतले. शालू कोल्हे यांच्या लढ्यात दर वर्षी एका प्रशिक्षित महिला कार्यकर्त्याची भर पडत गेली. जाणीवजागृती वाढत गेली. या शालू कोल्हे यांचा रोटरी, पुणे यांनी सर्वांत प्रथम २०२२ मध्ये जलदुर्गा पुरस्कार देत गौरव केला . त्या आता सर्व महाराष्ट्रभर जलदुर्गा म्हणूनच ओळखल्या जातात. (क्रमश:)
अॅग्रोवन ९.५.२५
सतीश खाडे, ९८२३०३०२१८, 'अभिनव जलनायक' या पुस्तकाचे लेखक