जयपूर (राजस्थान) – येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने ४ जिहादी आतंकवाद्यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरवर आझमी, सैफुरहमान, महंमद सैफ आणि शाहबाज अहमद अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे शिक्षा सुनावल्यानंतरही सर्व दोषी आतंकवादी हसत हसत न्यायालयातून बाहेर पडले. त्याच्या चेहर्यावर भीतीचा लवलेशही नव्हता.
या बाँबस्फोटांच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती; परंतु राजस्थान उच्च न्यायालयाने २९ मार्च २०२३ या दिवशी सर्व आरोपींना निर्दोष सोडले. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, पोलिसांचे आतंकवादविरोधी पथक कोणतेही पुरावे सादर करू शकले नाही आणि स्फोटात कट रचल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताही आधार सिद्ध करू शकले नाही.
अन्वेषणात अनेक त्रुटी निदर्शनास आल्यानंतर त्या दूर करून पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात आले होते. यात जिवंत बाँबच्या प्रकरणात या आरोपींना आता शिक्षा झाली. सध्या बाँबस्फोटांतून निर्दाेष मुक्त करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे.
सनातन प्रभात ८/४/२५