निर्मल वारी

Vartapatra    30-Jun-2025
Total Views |

Sanskrutik Vartapatra_Anya_73
 
आपल्याकडे वर्षानुवर्षे वारीची परंपरा आहे. वारीमध्ये वारकऱ्यांना सगळ्या व्यवस्था पुरवल्या जातात, वारीच्या काळात कोणताही वारकरी कधीच उपाशी राहत नाही, वारकऱ्यांना अगदी पाण्याच्या टँकरपासून ते मोबाईल चार्जरपर्यंतच्या सुविधा पुरविल्या
 जातात. त्याचप्रमाणे वारी दरम्यान कचरा निर्मूलनासाठी व वारीतील स्वच्छता टिकून रहावी, यासाठी बऱ्याच संस्था वारीमध्ये सहभागी होत असतात. पण एक प्रश्न नेहमी दुर्लक्षित होत असतो, तो म्हणजे शौचालयाचा. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यासाठी काहीतरी काम करणे आवश्यक होते.
जेव्हा कधी वारकऱ्याला शौचालयाला जायचे असेल, आणि तिथे कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नसेल, तर वारकरी ते रोखून ठेवतात. त्यामुळे देखील त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. ज्या गावातून पालखी पुढे जाते, त्या गावामध्ये वारीच्या काळात वारकरी उघड्यावरच सगळे विधी करतात, कारण त्यांना प्रातर्विधीसाठी गावातील मैदानाशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या ओघासोबतच ती घाण गावातील पिण्याच्या साठ्यांमध्ये जाऊन मिसळते आणि त्यातून गावात मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.
शौचालयाच्या प्रश्न सोडविण्यासाठी 'निर्मल वारी' हा उपक्रम 'सेवा सहयोग' या संस्थेच्या बॅनरखाली राबवण्याचा निश्चय झाला. सेवा सहयोग ही संस्था समाजात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण यासाठी काम करते. गावात पालखीचा मुक्काम केवळ एका रात्रीपुरता असतो, संपूर्ण दिवसदेखील नसतो. म्हणून टॉयलेट मॉडेल हे पोर्टॆबल आणि फोल्डेबल हवे होते आणि भांडवली खर्च न करता ते उपलब्ध करून द्यायचे होते. सुदैवाने आपल्या भारतात अशा प्रकारचे मॉडेल बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्या अशा प्रकारच्या उपक्रमाला उपयोगी पडतील, असे टॉयलेट मॉडेल तयार करतात, त्यांच्या कंपनीचे टँकर असतात. ते मैला गोळा करून ते मलनिस्सारण केंद्रात घेऊन जातात.
सेवा सहयोग या संस्थेने तुकाराम महाराजांच्या पालखीच्या वाटेवरील लोणी व यवत या गावांची निवड केली. या उपक्रमासाठी गावामध्ये एक छोटेखानी सर्वेक्षण केले. पालखी कुठे उतरते? दिंड्या कुठे थांबतात? त्यानुसार किती शौचालये लागतील, याचा अंदाज घेतला. सगळ्या गोष्टीचे योग्य नियोजन करून लोणी आणि यवत या गावामध्ये प्रत्येकी सुमारे २००-२०० शौचालये बसवण्याचा निर्णय घेतला. पण नुसतीच शौचालये बसवून भागणार नव्हते. वारकऱ्यांची मानसिकता बदलणे, हा देखील त्यातील एक महत्त्वाचा भाग होता. यासाठी कार्यकर्त्यांची पथके तयार केली गेली आणि दोन्ही गावांमध्ये अडीचशे, अडीचशे कार्यकर्त्यांची पथके पाठवली. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात काम करणारे संघाचे स्वयंसेवक, भाजपाचे कार्यकर्ते व सेवा सहयोग संस्थेचे कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून या पथकांची रचना केली. या कार्यकर्त्यांनादेखील योग्य प्रशिक्षण दिले गेले. कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांना हात जोडून सांगितले, ''माऊली, शौचालयाचा वापर करा.'' ज्या ज्या ठिकाणी शौचालये उभी केली होती, तेथे कार्यकर्ते पूर्ण वेळ उभे होते. वारकऱ्यांना या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.
शिवाजीराव मोरे यांनी देहू संस्थानातदेखील प्रचार केला. देहू संस्थानाचे प्रमुख शांताराम मोरे यांनी दिंडी प्रमुखांची भेट घेतली आणि त्यांनादेखील या उपक्रमात सहभागी करून घेतले. महिला कार्यकर्त्यांची साथ मोठ्या प्रमाणावर मिळाली. कारण वारीमध्ये येणाऱ्या महिला वारकऱ्यांची संख्याही अधिक होती. ४३ महिला, बाळासाहेब अमराळे यांच्यासोबत लोणीला आल्या होत्या आणि संतोष दाभाडे यांच्यासोबत ३० महिला यवतला आल्या होत्या. या उपक्रमात महिलांचे मोठे योगदान होते.
काही गावांमध्ये ज्या ठिकाणी आठवड्याचा बाजार भरतो, त्या ठिकाणाचा वापर वर्षानुवर्षे वारकरी शौचासाठी करत होते. त्यामुळे पालखीचा मुक्काम गावातून गेल्यावर पुढचे पंधरा दिवस गावकरी त्या ठिकाणी फिरकतही नसत. पण यावेळी त्याच ठिकाणी शौचालय उभारले होते. तेथून केवळ १५ फुटावर बसून कार्यकर्ते पोहे खात होते, हे सगळे खूप अप्रूप होते. एका गावासाठी केवळ चार लाख एवढाच खर्च आम्हाला आला.
आज या उपक्रमाद्वारे सरकारला दाखवून देण्यात आले की कमी खर्चातदेखील असे उपक्रम राबवले जाऊ शकतात. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन सरकारने अशा प्रकारची शौचालय पंढरपूरमध्ये उभी केली. शासनाने या प्रयोगाकडे गांभीर्याने बघितले, तर 'निर्मल वारी' हा उपक्रम महाराष्ट्रात सगळ्याच देवस्थानांच्या ठिकाणी राबवता येईल. हा केवळ श्रद्धेचा प्रश्न नाही, तर हा मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे आताही सगळ्यांनी अशा उपक्रमाचा विचार करणे गरजेचे आहे.
प्रदीपदादा रावत,
 
विवेक, निर्मल वारी विशेषांक २०१६