आजच्याच दिवशी, ३ जून १९४७ रोजी ब्रिटनचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा ब्रिटिश सरकारच्या भारताला स्वातंत्र्य देण्याच्या धोरणाचा एक भाग होती. मुस्लीम लीग दीर्घकाळापासून स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राच्या (पाकिस्तान) मागणीवर ठाम होती; तर कॉंग्रेसला एकत्रित भारत हवा होता. मात्र, देशात वाढणारे हिंदू-मुस्लिम तणाव, १९४६मधील दंगली आणि निर्माण झालेली अस्थिरता पाहता भारताचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
योजनेनुसार ज्या भागात मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्य होती ते पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि उर्वरित भाग भारतात राहिला. पंजाब आणि बंगालसारख्या मिश्र लोकसंख्येच्या राज्यांनाही धर्माच्या आधारे विभागले गेले. संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला.
मात्र फाळणीच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार आणि विस्थापन झाले. ही भारताच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायक घटना ठरली.या निर्णयाचे परिणाम अजूनही भारत पाकिस्तान संबंधांवर प्रभाव टाकताना दिसतात.
म.टा. ३.६.२५.