क्षितिज समांतर जैविक गाळणी (इको फ्रेंडली फिल्टर) असे याचे स्वरूप आहे. जलाशयांच्या शुद्धतेसाठी संबंधित जलाशयांनीच विकसित केलेल्या जैविक प्रक्रिया असेही त्याला म्हणता येईल. (ग्राफ्टिंग ऑफ इकोसिस्टीम फॉर द रिव्हायल ऑफ सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर बॉडी). नदी जिवंत मानली तर तिच्या स्वतःच्या काही अंतर्गत प्रक्रिया असतात. प्रदूषणामुळे त्या बंद
पडतात, त्या प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते.
प्रवाहाला काही प्रमाणात अडवणारी पर्यावरण पूरक जैविक गाळणी (ग्रीन ब्रिजेस) लावली जाते. त्यात सूक्ष्मजीवांसह अनेक जैविक घटकांचा (बायो कल्चर) वापर केला जातो. या जैविक गाळण्यांचा आकार नदीचा प्रवाह, त्यातल्या सांडपाण्याचे प्रमाण, प्रदूषणाचा स्तर यावर ठरवला जातो. या साऱ्या बाबी नदीपात्रातच उभारल्या जात असल्यामुळे प्रकल्पासाठी कोणतीही अतिरिक्त जागा लागत नाही. कोणतीही ऊर्जा, यंत्रे, रसायने किंवा अनावश्यक बांधकामे यांची गरज नसते. सुरुवातीच्या काळाव्यतिरिक्त देखभालीसाठी मनुष्यबळही फारसे लागत नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर शेतात नुसती दगडे रचून ताली बांधतो, तसेच नदीच्या प्रवाहात उभारायच्या. गरज असेल त्याला आधारासाठी जाळी बांधायची. म्हणजे गॅबियन बंधाऱ्याचे रूप द्यायचे. प्रवाहाकाठी, प्रवाहात छोटे बेट असेल तिथे काही झाडाझुडपांची लागवड, सगळ्यात मुख्य म्हणजे निवडक जिवाणू समुच्चय (बॅक्टेरीया कंन्सॉर्शिअम) यांची बांधणी करायची. या सूक्ष्मजिवांच्या वाढीसाठी काही काळासाठी तरी दूषित प्रवाहाचा वेग कमी करून स्थिर ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी आवश्यकता असल्यास प्रवाह थोडाबहुत वळवून, त्यातील वाहणारा प्लॅस्टिक व तत्सम घन कचरा अडवण्यासाठी काही झाडे झुडपे लावावी लागतात. खालील वाळू किंवा मातीला आधार द्यावा लागतो. त्यासाठी दगडी ताली किंवा गॅबियन बंधारासदृश संरचना उपयोगी ठरतात. बरे ही झाडे झुडपेही दूषित पाण्यात वाढणारी, पुरामध्येही तग धरणारी निवडली जातात. त्यांच्या मुळांच्या श्वसनामुळे दूषित पाण्यात ऑक्सिजन मिसळत राहतो.
प्रत्यक्ष जिथे प्रवाहावर काम करायचे तेथील निसर्गच बरेच काही सांगत असतो. ते ऐकण्यासाठी बारकाईने केलेले निरीक्षण महत्त्वाचे ठरते. प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये त्याची खूप मदत होते. उदा. नदीच्या काठावर दिसणाऱ्या पक्ष्यांवरूनही अनेक अनुमान काढता येतात. घार, कावळे, टिटव्या असे पक्षी बहुधा कुजलेले मांस खातात. त्यावरून तिथे मृत मासे मोठ्या संख्येने आहेत, हे समजते. याचा अर्थ नदीची परिस्थितिकी मृतावस्थेकडे निघाली आहे, हे समजू शकते. त्याऐवजी जिवंत मासे खाणारे खंड्या, बगळा या सारखे पक्षी व त्यांची मुबलक संख्या असेल, ती नदी जिवंत आहे असे मानण्यास वाव असतो.एखाद्या नदीच्या परिसरात पिंपळ, वड, उंबर, करंज व तत्सम वृक्ष खूप कमी असतील किंवा अजिबात नसतील तर त्यांच्या बिजांचे वहन करणारे पक्षी तिथे नाहीत, हे समजावे. हे पक्षी नसण्यामध्ये भारद्वाजासारखे आक्रमक पक्ष्यांची अधिक संख्या कारणीभूत असू शकते. भारद्वाज पक्षी विविध पक्ष्यांना घरट्यातून हुसकून त्यांच्या अंड्याचा फडशा पाडतात. परिणामी, अंतिमतः या पक्ष्यांची संख्या कमी आणि म्हणून त्यांच्या विष्ठेद्वारे वाढणारी वृक्षसंपदाही कमी ही स्थिती असते. जिथे जलपर्णी आहे, त्या पाण्यात फॉस्फेट, नायट्रेट व तत्सम रसायने आहेत. बेशरम, अळू, कर्दळी भरपूर वाढलेली असेल तर पाणी नक्की दूषित आहे. कारण ही पक्ष्यांशिवाय वाढणारी इकोसिस्टीम आहे.नदी पात्राबाहेर, पण लगतच्या भागात विविध कीटकांसह बरेच जीव दिसतात. उदा. विंचू, सरडे, गोम, छोटे साप इ. दगड किंवा त्यांच्या खोबणीत आढळतात. असे छोटे सरपटणारे प्राणी नदीकाठच्या भागात असल्यास तिथली प्रदूषणाची पातळी खूप कमी असल्याचे स्पष्ट होते. ते दिसत नसल्यास त्यांचा आहार असलेले कीटकही नाहीत. म्हणजेच ती जागा प्रदूषित आहे.नदीकाठांवर, पाण्यातल्या जलपर्णीवर, पाण्यात पडलेल्या व सडलेल्या कचऱ्यांवर अनेक प्रकारच्या बुरशी उगवतात. अति प्रदूषित पाण्यातही अनेक बुरशी येतात. या जैवनिदर्शकांमुळे (बायोइंडीकेटर) आपली प्रवाहाबद्दलची समज वाढते. त्यातून त्या त्या प्रवाहाची नेमकी समस्या काय आहे, हे स्पष्ट होते. त्यावर त्यांच्या जैवसुधारणा प्रक्रियेचा (बायोरिमिडिअल ट्रिटमेंट) आराखडा ठरवला जातो.क्रमश:अग्रोवन १३/६/२५