विदर्भ हा महाराष्ट्रातील एक प्रमुख कृषिप्रधान प्रदेश असून, गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्था या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहेत. यापैकीच ‘दिलासा’ ही संस्था शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि सिंचनाच्या उपाययोजना राबवून, संकटग्रस्त शेतकर्यांना नवजीवन देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. पतीच्या निधनानंतरही खचून न जाता समाजासाठी सुरू असलेले संस्थेचे कार्य अविरतपणे चालू ठेवणाचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे ते विजया मधुकर धस यांनी. आज विदर्भातील शेतकर्यांना मदतीचे एक आदर्श उदाहरण म्हणून विजया यांच्या कार्याकडे पाहिले जाते.
विजया यांचा जन्म १९६९ साली यवतमाळमधील पाटणबोरी येथे झाला. त्यांचे बालपणही याच गावी गेले. चार बहिणी, दोन भाऊ, आईवडील असा त्यांचा परिवार. घरची परिस्थिती मात्र अत्यंत हलाखीची. विजया यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर महाविद्यालयात शिकतानाच लगेचच नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यांना समाजकार्याची लहानपणापासूनच आवड. नोकरीच्या शोधात असताना ‘वंचित विकास’ या संस्थेमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. तिथेच विदर्भ प्रमुख म्हणून असलेले मधुकरराव (मूळचे मराठवाड्यातून आलेले) यांची भेट झाली. दोघांनाही सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे समाजासाठी काहीतरी वेगळे करायचे, असे दोघांचेही स्वप्न होते. १९९३ साली विजया आणि मधुकर धस यांनी पुण्यात लग्नगाठ बांधली. १९९३ साली विजया ‘एमएसडब्ल्यू’ करत होत्या, तेव्हाच त्यांच्या स्वप्नांची सुरुवात झाली. पुढे मित्रमैत्रिणींच्या सोबतीने १९९४ साली ‘दिलासा’ नावाच्या संस्थेची स्थापना झाली. तेव्हाही आर्थिक परिस्थिती तशी बिकट होती. मात्र, आपण समाजाचे देणे लागतो, हा विचार त्यांच्या कायम डोयात असायचा. सर्वप्रथम संस्थेच्या माध्यमातून विजया यांनी देहविक्रेय करणार्या परिसरातील महिलांच्या मुलांसाठी काम करण्याचे ठरवले. मुलांसाठी काम करत असताना २० अनाथ मुलींचे लग्नही विजया यांनी लावून दिले. तसेच, आठ मुलांना वेगवेगळे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. आज ही मुले जेव्हा ‘आई’ म्हणून हाक मारतात, तोच आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद असल्याचे विजया अभिमानाने सांगतात.आज ‘दिलासा’ संस्था जलसंवर्धन क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. कमी खर्चिक शेती करून स्वतःसाठी विषमुक्त अन्न कसे खाता येईल, यासाठीदेखील ही संस्था प्रयत्नशील आहे. पांढरकवडा येथे जंगोदायी टेकडीवर ‘एसबीआय फाऊंडेशन’च्या माध्यमातून १५ हजार वृक्षलागवड करून जंगल संवर्धनाचे कामही संस्था करते. २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यासाठी मधुकर धस यांना गौरविण्यात आले होते. २०१६ साली कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मधल्या काळात मधुकर यांचे निधन झाले. संस्थेचा संपूर्ण डोलारा एकट्या विजया यांच्यावर येऊन पडला. मात्र, विजया यांनी धीर सोडला नाही. आज विदर्भ आणि मराठवाडा या भागांतील २५ लहान स्वयंसेवी संस्थांसोबत घनिष्ठ सहकार्याने संस्था कार्य करते आहे. ही संस्था शेतकरी साहाय्यता केंद्र चालवते, शेतकरी व ग्रामीण जनतेसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती प्रसारित करते. संस्थेने आज राज्यातील एक हजार, ६०० गावांमधील दोन लाख, चार हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोच साधली आहे.‘फड’, ‘दोहा मॉडेल्स’, ‘बोडी फड’, ‘शेततळे’ आणि ‘एमआयपीएम’ प्रकल्पांद्वारे ४१ हजार, ५५२ हेटरपेक्षा जास्त जमिनीत सिंचनाची सुविधा निर्माण केली. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये २५२ ‘फड’ विकसित केले, ज्याअंतर्गत तीन हजार, ९०६ शेतकर्यांची ११ हजार, ७१८ एकर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली रूपांतरित केली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एक हजार, ७०० ‘रिचार्ज पिट्स’ बांधण्यात आले, ज्याद्वारे एक हजार, ७०० शेतकर्यांची चार हजार, २५० एकर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आली. तसेच, गरजू महिलांसाठी ९५ ‘कस्टम हायरिंग सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे.समाज विशेषतः त्यामधील गरीब लोक, स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी सक्षम व्हावेत आणि शाश्वत परिसंस्थांमध्ये आपली उपजीविका सुरक्षित करावी, यासाठी संस्था सध्या झटते आहे. व्यक्ती, गट, समुदाय आणि इतर संस्थांना एकत्रित परिसंस्था विकासासाठी प्रेरणा, ऊर्जा आणि सक्षमतेसह कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आणि त्यांच्या कल्याणासाठी शाश्वत पायावर आधारलेला विकासात्मक पाठिंबा प्रदान करणे, हे ध्येय समोर ठेवून संस्थेची वाटचाल सध्या सुरू आहे. विजया म्हणतात, " ‘दिलासा’ ही संस्था संकटग्रस्त शेतकर्यांसाठी शाश्वत उपजीविकेच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करते. विविध सहा प्रकल्पांमुळे विदर्भातील सहा संकटग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल.”मुंबई तरुण भारत २०/६/२५