भारत सरकार पेट्रोलियम क्षेत्रात वेगाने काम करत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून संभाव्य विविध ठिकाणी तेलाचे साठे शोधण्याचे काम सुरू आहे, यातूनच अंदमानच्या समुद्रातही कच्च्या तेलाचे साठे शोधण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अंदमानच्या समुद्रात जर तेलसाठा सापडला तर भारताला इतर देशांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे, असे संकेत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले. द न्यू इंडियन या वेबसाइटला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
भारतात ८५ ते ९० टक्के कच्चे तेल इतर देशांतून आयात केले जाते. भारत हा कच्च्या तेलाचा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आहे. यात पहिल्या स्थानावर अमेरिका तर दुसऱ्या स्थानावर चीन आहे. अशातच, अंदमानच्या समुद्रात कच्च्या तेलाचा साठा सापडणे हे भारतासाठी परिवर्तन घडवणारे ठरू शकते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी अंदमान येथील कच्च्या तेलाच्या साठ्याबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, “भारत अंदमानच्या समुद्रात तेल साठ्यांच्या शोधाच्या उंबरठ्यावर आहे. जर भारत अंदमानच्या समुद्रात गयानाएवढा तेलसाठा शोधण्यात यशस्वी ठरला तर भारतासाठी ही खूप मोठी गोष्ट असेल. भारताचे इतर देशांवर अवलंबून राहणे हे कमी होईल. भारत आपल्या गरजेनुसार कच्चे तेल स्वतःच उत्पन्न करू शकतो”, असे मंत्री पुरी म्हणाले.महा एमटीबी