मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात 'शिवआरमार संग्रहालय' उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी या संकल्पनेमागचा इतिहास, स्थलवैशिष्ट्ये, विकासाच्या दृष्टीने असलेले महत्त्व मांडले. समुद्र किनाऱ्यावर 'शिवस्मृती' जपणाऱ्या या प्रकल्पामुळे धार्मिक-ऐतिहासिक पर्यटनाला नवा आयाम मिळणार आहे, अशी भावना बैठकीतून व्यक्त झाली. यामुळे राजकोटचा किल्ला इतिहासाचा साक्षीदार न राहता, ते एक प्रेरणास्थळ ठरणार आहे. छत्रपतींच्या नौदल परंपरेचा जयघोष या संग्रहालयातून देशभर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मुंबई तरुण भारत १२/६/२५