नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष शर्मा यांना 'पद्मश्री' प्रदान

Vartapatra    02-Jun-2025
Total Views |

 
sanskrutik vartapatra krushi_48.jpg

 
यवतमाळ - पर्यावरणावर आधारित नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष शर्मा यांचा मंगळवारी (ता. २७) दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य मंत्री व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 

यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या सुभाष खेतूलाल शर्मा यांनी पर्यावरणावर आधारित शेती पद्धतीचे अभिनव असे मॉडेल विकसित केले आहे. शिवारात मित्र किडींचा वावर वाढावा याकरिता त्यांनी रासायनिक फवारणी बंद केली. त्यासोबतच पक्ष्यांच्या माध्यमातून कीड नियंत्रण प्रभावी होते, ही बाब लक्षात घेता बांधावर तसेच शेताच्या विविध भागांत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. या झाडांचा उपयोग पक्षी थांब्यासारखा होतो. त्यासोबतच शेतात जिवाणूंचे प्रमाण वाढावे यावरही त्यांनी भर दिला आहे.

 

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्ब गरजेचा असतो. तो वाढल्यास सुपीकता आणि पर्यायाने उत्पादकता वाढते, या अनुभवातून त्यांनी अनेक व्यापक उपायांवर भर दिला आहे. एनपीके, सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता देखील ते शिवारातील विविध घटकांच्या बळावरच करतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे बाजारातील महागड्या निविष्ठांवर अवलंबून राहावे लागत नाही. पर्यायाने उत्पादकता खर्चात मोठी बचत होते. शाश्वत शेतीसाठी अशा प्रकारच्या पॅटर्नचा अवलंब वाढला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

रासायनिक घटकांचा वापर करून उत्पादित केलेल्या शेतीमालाचा आहारात वापर केल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी देखील नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतीमालाचाच आग्रह धरावा, असे आवाहन श्री. शर्मा यांनी केले.


 Agrowan 29.5.25