पाकमध्ये चिनाब नदीचे पाणी घटल्याने ४० टक्के पिके नष्ट होण्याची शक्यता !

Vartapatra    19-Jun-2025
Total Views |

sanskrutik vartapatra pakistan_21 
भारताने सिंधु जल वाटप करार थांबवल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. भारताने महिनाभरापूर्वी बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे बंद केले होते. याचा परिणाम पाकिस्तानातील चिनाब नदीच्या पाण्याच्या पातळीवर होत आहे. पाकमधील चिनाब नदीचा प्रवाह ९२ टक्क्यांनी अल्प झाला आहे. जवळपास २० दिवसांपूर्वी या नदीतील पाण्याचा प्रवाह ९८ सहस्र २०० क्युसेक होता. आता तो केवळ ७ सहस्र २०० क्युसेक इतका अल्प राहिला आहे. ही पातळी ३ सहस्र क्युसेकच्या खाली जाऊ शकते. पाकच्या पंजाब आणि सिंध प्रांतांतील ६ कोटी ५० लाख शेतकरी सिंचनासाठी चिनाब नदीवर अवलंबून आहेत. अशा वेळी पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे येथील ४० टक्क्यांपेक्षा अधिक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

खरीप हंगाम इतिहासातील सर्वांत वाईट असेल ! – पाकचे कृषी मंत्रालय
 
पाकने सिंधु नदीवर बांधलेल्या तारबेला धरणात आणि झेलम नदीवर बांधलेल्या मंगला धरणातही पाण्याची मोठी कमतरता आहे. जगातील ७ व्या क्रमांकाचे सर्वांत मोठे धरण असलेल्या मंगला धरणात आता २७ लाख एकर फूट पाणी शेष आहे. त्याची एकूण क्षमता ५९ लाख एकर फूट आहे. त्याच वेळी तरबेलामध्ये केवळ ६० लाख एकर फूट (एकूण क्षमता ११६ लाख एकर फूट) पाणी शेष आहे. जर पाणीपुरवठा असाच अल्प होत राहिला, तर आतापर्यंत साठवलेल्या पाण्यापैकी ५० टक्के पाणीही संपणार आहे. यामुळेच पाकच्या कृषी मंत्रालयाने म्हटले की, या वेळचा खरीप हंगाम इतिहासातील सर्वांत वाईट असेल.

शेतकरी इस्लामाबादमध्ये मोर्चा काढणार !
 
पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे आतापर्यंत २ सहस्र २०० अब्ज रुपयांची हानी झाली आहे. जर पाण्याची समस्या सोडवली नाही, तर वर्षाच्या अखेरीस हा हानी ४ सहस्र ५०० अब्ज रुपयांपर्यंत पोचू शकते. हे प्रमाण एकूण कृषी उत्पन्नाच्या २३.१५ टक्के आहे. यामुळे शेतकरी संघटनांमध्ये पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात रोष आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर शेतकरी इस्लामाबादमध्ये मोर्चा काढतील, अशी चेतावणी ‘पाकिस्तान किसान इत्तेहाद’ या शेतकरी संघटनेने दिली आहे.

या संघटनेचे अध्यक्ष खालिद महमूद खोखर म्हणाले की, पिकांची हानी झाल्याने शेतकर्‍यांचे कर्ज वाढत आहे. त्यामुळे लाखो शेतकरी उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत.

पंजाब प्रांतातील शेतकरी नेते अहमद शरीफ म्हणाले की, आता पाण्याची समस्या ही राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती बनली आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

पाकने पाण्यासाठी आतापर्यंत भारताला ४ पत्रे पाठवली !
 
पाकिस्तानने आतापर्यंत सिंधू जल वाटप कराराच्या पुनर्संचयनाच्या संदर्भात भारताला ४ पत्रे पाठवली आहेत. ही चारही पत्रे पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तझा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला पाठवली होती. त्यानंतर मंत्रालयाने ती परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवली.

सनातन प्रभात १७/६/२५