ज्येष्ठ निसर्ग लेखक, अभ्यासक आणि अरण्यऋषी अशी बिरुदावली मिळालेले मारुती चितमपल्ली यांचे बुधवार दि. १८ जून रोजी सोलापूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांना नुकताच भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार स्वीकारला होता. 'वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार' म्हणून गौरविण्यात आलेल्या त्यांनी पक्षीकोषाच्या माध्यमातून पक्ष्यांना भारतीय नावे देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे, पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले.
महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे.
वनाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्याने चितमपल्ली यांना वनांचे साहचर्य लाभले. आपल्या व्यवसायाचा सांधा अभ्यास विषयाशी जोडून घेत ऋषिवत जीवन त्यांनी व्यतीत केले. पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलिम अली, नरहर कुरुंदकर, व्यंकटेश माडगूळकर आणि गो. नी. दांडेकर यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षणाची व ललित लेखनाची प्रेरणा मिळाली.
प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढून देशोदेशीच्या दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह त्यांनी केला, त्यांचे वाचन परिशीलन केले. त्यातून त्यांच्यातला ललितलेखक आणि वनविद्येचा अभ्यासक घडला. १८ भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीने आपला समृद्ध असा निसर्ग-जीवनानुभव आपल्या २१ ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे. ललितगद्य, कथा, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्र, कोशवाङ्गय, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले. चितमपल्ली हे मुळात पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक. अरण्य जीवनावरील अनुभव आणि संशोधन लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाची वाट अनुसरली.
चितमपल्ली यांच्या ललित लेखनाचा, त्यांच्या वनविद्येच्या अभ्यास व संशोधनाचा गौरव त्यांना अनेक झळकती मानचिन्हे देऊन करण्यात आला.
मुंबई तरुण भारत १८/६/२५