जवानांसाठी तवांग येथे ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित

Vartapatra    14-Jun-2025
Total Views |
 
sanskrutik vartapatra anya 56
 
सीमावर्ती प्रतिकूल भागात अहोरात्र देशसेवा करणाऱ्या सैनिकांना श्वास घेणे सुकर व्हावे, यासाठी पुण्यातील चिथडे दाम्पत्याने स्थापन केलेल्या 'सिर्फ' संस्थेने तवांग येथे तिसरा ऑक्सिजन निर्मिती व पुनर्भरण प्रकल्प कार्यान्वित केला आहे. सर्वच स्तरांतून मिळालेल्या प्रतिसादातून सुमारे साडेदहा कोटी रुपयांचे हे तिन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले. ब्रिगेडिअर भूपाल सिंह, कर्नल मिलिंद सावंत, 'सिर्फ च्या संस्थापक सुमेधा योगेश चिथडे, सचिव अनुराधा कोटीभास्कर, मंजिरी जोशी आदीच्या उपस्थितीत तवांग येथे प्रकल्पास प्रारंभ झाला.


सोल्जर्स इंडिपेडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन (सिर्फ) ही संस्था १९९९ मध्ये हवाई दलात काही काळ सेवा बजावलेले योगेश चिथडे व शाळेत शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी सुमेधा यांनी स्थापन केली. संस्थेतर्फेच परमवीरचक्र विजेते मानद कॅप्टन बाणासिंग यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात 'सियाचिनसारख्या भागात श्वास घेणे हीदेखील चैन वाटावी अशी परिस्थिती असते. ऑक्सिजनअभावी अनेक सैनिकांचे प्राण जातात,' असे कॅप्टन बाणासिंग यांनी सांगितले. तेव्हापासून या सैनिकांच्या श्वासासाठी आपण ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निश्चय चिथडे दाम्पत्याने केला.

कोठे आहेत प्रकल्प ?
सियाचिन (२०१९), कुपवाडा (२०२२) आणि आता तवांग येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरू झाले आहेत. तिन्ही सीमावर्ती भागातील सुमारे दीड लाख जवान, पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना या प्रकल्पाद्वारे प्राणवायू सहज उपलब्ध होणार आहे.


म.टा. ७/६/२५