वडाची रोपे लावून पर्यावरण जपणाऱ्या कर्नाटक राज्यातील ११३ वर्ष वयाच्या एका प्रेमळ आजींचे कार्य आपण जाणून घेऊया.
या आजींचे नाव आहे सालुमरदा थिमक्का. (कर्नाटक मध्ये सालुमरदाचा अर्थ आहे झाडांची सरळ रांग) थिमक्कांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही व वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी थिमक्कांचे लग्न झाले. थिमक्कांना जेव्हा कळाले की आपल्याला अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही तेव्हा त्यांनी ठरवले की आपण झाडांनाच आपले अपत्य समजून त्यांना वाढवायचे व त्यांची काळजी घ्यायची.
एकदा राज्य महामार्गावरून जातांना थिमक्का व त्यांच्या पतीच्या लक्षात आले की या रस्त्यात विसाव्याला बसायला सावलीच नाही. थिमक्का ज्या गावात रहात होत्या त्या गावात वडाचे खूप रोपे होती. याच रोपट्यांना महामार्गाच्या दोन्ही बाजूला लावायचे असे त्यांनी ठरवले. थिमक्कांनी सन १९४७ मध्ये आपले पती चिक्कन्नांसोबत मिळून “हुलिकल व कुडूर” या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ९४ लगत समरुवातीला १० वडाची रोपे लावली. रोज पाण्याचे चार डब्बे घेऊन ते दोघे निघायचे व या वडाच्या झाडांना पाणी द्यायचे. ह्या रोपांना जनावरांनी खाऊ नये म्हणून त्यांनी रोपाभोवती काटेरी काड्यांचे कुंपण देखील केले.
त्यांनी दर वर्षी २० ते ३० वडाची नवीन रोपे या मार्गावर लावली व सर्व रोपांचे संवर्धन केले.
असे करत या दांपत्यांनी या राज्य महामार्गाच्या दुतर्फा सलग ४ किलोमीटर अंतरात एकूण ३८५ वडाची झाडे लावली व ही झाडे अगदी मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेतली. थिमक्कांच्या या अथक प्रयत्नांनी आज या राज्य महामार्गाचे रूप मोहक बनवले आहे.
थिमक्कांनी वडाप्रमाणेच इतर वेगवेगळ्या प्रकारची ८००० झाडे लावली आहेत व त्यांचे संवर्धन केले आहे.
थिमक्का अगदी आपल्या मुलांप्रमाणे या झाडांची काळजी घेतात… त्यांची माया करतात… झाडाला मिठी मारून डोळे बंद करून झाडांसोबत गप्पा मारतात. त्या झाडांच्या आई होतात म्हणूनच सर्व जग त्यांना “वृक्ष माता” म्हणून ओळखते.
हाच आहे पर्यावरणीय स्त्रीवाद… स्त्रीमधील मातृत्व भाव जसा तिच्या अपत्याप्रती व्यक्त होतो तसा तो पर्यावरणाप्रती देखील व्यक्त होतो.
प्रत्येकाला आयुष्यात संकटांना सामोरे जावे लागते परंतु काही ईश्वरीय शक्ती असणाऱ्या व्यक्ती असतात ज्या आपल्या संकटांवर मात करून समाजासाठी, निसर्गासाठी भरीव कार्य करतात. थिम्मक्का या याच ईश्वरीय शक्तीचे उदाहरण आहेत असे मला वाटते.
सन २०१६ मध्ये बी बी सी ने जगामधील सर्वोच्च १०० प्रेरणादायी महिलांमध्ये थिमक्कांचे नाव सामील केले होते.
थिमक्कांच्या हे पर्यावरण संवर्धनाचे निःस्वार्थ समर्पण पाहून त्यांच्या कार्याची दखल घेत सन २०१९ मध्ये भारत सरकारने त्यांना “समाज कार्य” या श्रेणीमध्ये चतुर्थ सर्वोच्च नागरी पुरस्कार “पद्मश्री” ने सन्मानित केले आहे.
थिमक्कांचे कार्य पाहून बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी आठवतात…
जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं,
उच्च गगनासारख्या धरित्रीच्या रे मोलाचं…
एका व्यक्तीने ठरवले तर ती एकटी व्यक्ती काय करू शकते हे दाखवून आपल्या समोर आदर्श रचणाऱ्या थिमक्कांच्या कार्याला सलाम…

पद्मश्री केंडे,
छत्रपती संभाजीनगर.