
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडवणारे संस्कार दैनंदिन शाखेत कळत-नकळत घडत असतात. शाखा म्हणजे नित्य उपक्रम, आणि याच उपक्रमातून सज्जनशक्तीचे संघटन निर्माण करणे हे संघाचे कार्य आहे. एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असले तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. ऊन वारा पाऊस थंडी काहीही असले तरी नित्य शाखा लागलीच पाहिजे हा आग्रह आमच्या शिक्षकांचा असे. ३६५ दिवस 'Season is not the reason' या उक्तीप्रमाणे शाखा लागतात. यामुळे शाखेमध्ये जाणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांची ही कमिटमेंट त्यांना आयुष्यात खूप काही देऊन जाते. व्यावसायिक जीवनामध्ये मोठे व्हायचे असेल तर सातत्य अतिशय महत्त्वाचे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी विश्वासार्हता, दिलेला शब्द पाळणे असे अनेक छोटे मोठे गुण संघामुळे नकळतपणे माझ्यात रुजत गेले ज्याचा मला फायदा झाला.
माझ्या कामाच्या यादीत इतर लोकांकडून कितीही रेंगाळलेले प्रकल्प जेव्हा माझ्याकडून एकेक पूर्ण होऊ शकले आणि माझं काम अधिक संघटित झालं, माझं ध्येय अधिक स्पष्ट झालं, तेव्हा एक उत्तम प्रकल्प व्यवस्थापक म्हणून ओळख निर्माण झाली. माझ्या कारकिर्दीची मला अपेक्षा नसलेल्या मार्गाने प्रगती होऊ लागली हे सर्व निरंतरतेच्या सामर्थ्यामुळे!
एकदा एका मित्राच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या शाळेत मुख्याध्यापकांनी बोलावले म्हणून गेलो होतो. 'वर्गामध्ये दोन तासिकांच्यामध्ये तुमचा मुलगा गोंधळ घालतो' ही त्यांची तक्रार होती. मुख्याध्यापक थोडे कामात होते म्हणून सहजच वर्गापाशी चक्कर मारावी असे मित्राने सुचवले. आम्ही दोघेजण चालत त्या ठिकाणी गेलो, एक तासिका संपून दुसरी तासिका सुरू होणारच होती आणि त्यामध्ये त्या वर्गातील सर्व मुले प्रचंड गोंधळ घालत होती. त्यामध्ये माझ्या मित्राचा मुलगाही होता. मुख्याध्यापकांकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांचे गाऱ्हाणे मित्राला सांगितले, तेव्हा माझा मित्र म्हणाला, ''अहो सर, वर्गातील सगळीच मुले गोंधळ घालत आहे मग तुम्ही मलाच का बोलावले आहे?'' यावर मुख्याध्यापकांचे उत्तर म्हणजे "अहो तुमचा मुलगा शाखेत जातो ना? त्याने असे नको करायला." प्रसंग अतिशय छोटा पण समाजाच्या संघाकडून काय अपेक्षा आहेत हे यावरून माझ्या लक्षात आले.
मंदार पाठक, पुणे