मी एक संघ स्वयंसेवक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Vartapatra    07-May-2025
Total Views |

Sanskrutik vartapatra_Rss_deepak-bendre-shares-his-transformative-rss-branch-experience-solapur
 
साधारणपणे १९७४-७५ सालातील ही गोष्ट असेल. आम्ही सोलापूर येथे गोगटे बंगल्यात रहात होतो. वाडा खूपच मोठा होता. जवळ जवळ वीस बिऱ्हाडे तिथे रहायला होती. प्रत्येक घरात किमान चार मुलं अशी अगदी एक वर्षापासून वीस वर्षं वयाच्या मुलांपर्यंत अशी खूप मोठी संख्या आमच्या वाड्यात होती.
असेच एकदा माझी माझ्या गटातील मित्रांबरोबर भांडण होऊन कट्टी झाली आणि मला कुणी खेळायला घेईना, शाळेत जाताना बोलावणे वगैरे काही काळासाठी बंद झाले. त्यावेळी प्रथमच माझ्या बाबांनी मला संघाच्या शाखेत जायला सांगितले आणि मीही तिथे नवीन मित्र मिळतील या आशेने गेलो. मला आठवतंय तेव्हा विलास जंगम हे मुख्यशिक्षक होते आणि विश्वास पेठे हे कार्यवाह होते.
पहिल्याच दिवशी मी तिथे मनापासून रमलो. कारण शाखेतील खेळ, व्यायाम, प्रार्थना यासारख्या गोष्टी मला अगदीच नवीन होत्या. मला त्यात रस वाटत होता आणि हळूहळू आवडही निर्माण होऊ लागली होती. पुढे पुढे तर शाखेतील प्रार्थना म्हणणे तसेच इतरांना सांगणे ही शाखेतील माझी जबाबदारी झाली. एकूण काय तर नवीन मित्रांबरोबर मी चांगलाच रमून गेलो होतो. मग दररोज शाखेत जाणे हा माझ्या दैनंदिन वेळापत्रकाचा भाग बनून गेला.
पुढे काही दिवसांनी भुसावळचे प्रदीप केतकर हे नोकरीनिमित्त सोलापूर येथे आले आणि काही दिवसांनी ते मुख्यशिक्षक म्हणून जबाबदारी पाहू लागले.
एकदा प्रदीप केतकर मला म्हणाले, “मला तुझ्या घरी यायचं आहे.” मला इतका आनंद झाला की मुख्यशिक्षक नाही तर मुख्यमंत्रीच जणू काही आमच्याकडे येणार आहेत असे मला वाटायला लागले! वाड्यातील इतर मित्रसुध्दा तोपर्यंत माझ्याबरोबरची कट्टी संपवून माझ्याबरोबर शाखेत येऊ लागले होते. त्यामुळे त्या सर्वांनासुध्दा मुख्यशिक्षक आपल्या वाड्यात येणार आहेत म्हणून आनंद झाला होता. नंतर मग प्रदीप केतकर आमच्या घरी आले आणि वरचेवर येतच राहिले. अगदी आमच्या घरचेच झाले !
संघाचे कार्यालय हे आमच्या घराजवळच होते. प्रदीप केतकर यांच्यामुळे पुढे पुढे कुणीही प्रचारक कार्यालयात आले की त्यांची भोजनाची व्यवस्था आमच्या घरीच होत असे. त्यामुळे एखाद्यावेळी एखादे प्रचारक कार्यालयात आले पण आमच्या घरी आले नाहीत तर 'जेवायला आमच्या घरी का नाही आलात?' असं आमची आई त्यांना हक्काने विचारत असे. एकूण काय तर आमचे घर आणि संघकार्यालय यातदेखील आता घरोबा निर्माण झाला होता. त्यामुळे मी संघाच्या अधिक जवळ येत गेलो.
येणाऱ्या प्रचारकांचे विचार ऐकल्यामुळे त्या लहान वयातच मला अंतर्मुख होऊन विचार करायची सवय लागली. हेच संस्कार माझ्यावर आपोआप होत गेले. पुढे तीन दिवसांच्या शिबिराला मी गेलो. तिथली शिस्त, शिस्तीत चाललेले खेळ, वेळेचे काटेकोर बंधन पाळणारे वेळापत्रक, योगचाप आणि दंड चालविण्याचे प्रशिक्षण अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील, ज्या माझ्या जीवनावर प्रभाव पाडत होत्या. त्या शिबिरामधे श्री. पाथृडकरांनी दिलेले बौध्दिक मी आजतागायत विसरू शकलो नाही. त्या बौद्धिकात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा केलेला उल्लेख विसरणं केवळ अशक्य आहे. शिबिरात गायली गेलेली सांघिक आणि वैयक्तिक पदं हीसुद्धा फारच प्रेरणादायी असायची. त्यामुळे त्या शिबिरातून मला स्वयंशिस्त शिकायला मिळाली. नंतर प्राथमिक शिक्षा वर्ग सिध्देश्वर प्रशालेत झाला होता. त्यातसुध्दा मी सहभागी झालो होतो. तेव्हा वेगवेगळ्या व्यवस्थांमधे ज्येष्ठ स्वयंसेवक मन लावून कसे काम करत असतात ते जवळून बघायला मिळाले.
सुरुवातीला केवळ वेगळे खेळ आणि वेगळे मित्र मिळतील म्हणून शाखेत गेलेला मी आता हळूहळू संघाचा कार्यकर्ता झालो होतो.
श्रीराम शाखेतील आमचे समवयस्क श्री.सुहास हिरेमठ हे तेव्हा प्रचारक म्हणून बाहेर पडले होते. माझ्या दुर्दैवाने आणि कौटुंबिक अडचणींमुळे शिक्षण घेऊन चांगली नोकरी करणे या गोष्टीला मला प्राधान्य द्यावे लागले. त्यामुळे प्रचारक म्हणून जाण्याचा अनुभव मात्र मला घेता आला नाही. पण बारावीच्या वर्गात शिकत असताना दिवाळीच्या सुट्टीत मी सोलापूरजवळील 'देगाव' या गावी विस्तारक म्हणून गेलो होतो. तिथे दहा पंधरा दिवस घरापासून दूर राहिलो. तेव्हा दिवसभर समवयस्क मुलांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना शाखा म्हणजे काय हे लक्षात यावे म्हणून त्या गावात शाखा भरविणे, त्या सर्वांना शाखेवर आवर्जून बोलावणे तसेच संघाच्या शिस्तीत राहून त्यांचे खेळ घेणे आणि त्यांच्या मनात शाखेविषयी गोडी निर्माण करणे यासारख्या माझ्या बुद्धीला पटतील अशा सगळ्या गोष्टी तिथे मी करत होतो. यातून मी हळूहळू संघटनकौशल्य शिकत गेलो आणि पुढे महाविद्यालयीन जीवनात हे 'संघटनकौशल्य' मला चांगलेच उपयोगी पडले.

प्रा. दीपक भोलानाथ बेंद्रे, बार्शी