येत्या ४-५ वर्षात ५०० हुन अधिक रेल्वे कोच तयार केले जातील. तर २०३० पर्यंत ४०,००० कि.मी. नवीन रेल्वे मार्ग टाकण्याच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क विस्तार असेल. यांतर्गत, ४३४ उपप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यावर सुमारे ११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या विस्तारामुळे गाड्यांची संख्या वाढेल, त्यामुळे प्रमुख मार्गावरील भार कमी होईल आणि तिकिटांच्या वेटिंगची समस्या हळूहळू संपेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
कोच उत्पादन वेगाने
पाच वर्षांत ५०० हुन अधिक नवीन कोच तयार करणार आहे. हे डबे केवळ संख्येने जास्त नसून, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी असतील. याशिवाय, रेल्वेने ८,००० ट्रेन सेट खरेदी करण्याची योजना आखली आहे. ज्यावर एक लाख कोटी रुपये खर्च केले जातील. रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (चेन्नई), मॉडर्न कोच फॅक्टरी (रायबरेली) आणि रेल कोच फॅक्टरी (कपूरथळा) या तीन प्रमुख कोच उत्पादन कारखान्यांमध्ये उत्पादन क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.
वंदे भारत, अमृत भारत या आधुनिक गाड्यांचा विस्तार
२०३० पर्यंत २०० वंदे भारत आणि एक हजार अमृत भारत गाड्या चालवण्याची रेल्वेची योजना आहे. या गाड्या केवळ हाय-स्पीड नसतील, तर त्यात जागतिक दर्जाच्या सुविधाही असतील. वंदे भारत गाड्या आधीच अनेक मार्गावर प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देत आहेत. अमृत भारत गाड्या प्रामुख्याने पारंपरिक लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांची जागा घेतील.
एक हजार कोटी प्रवाशांसाठी तयारी
भारतीय रेल्वे सध्या दरवर्षी ८०० कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा देते आणि २०३० पर्यंत हा आकडा एक हजार कोटीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, रेल्वे तीन हजार अतिरिक्त गाडया चालवण्याची योजना आखत आहे. यामुळे अधिक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.
पुढारी २९.५.२५