नाशिक- पाणीटंचाईची समस्या आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध समाजकार्य महाविद्यालयातील पाच प्राध्यापकांनी आरोग्यवर्धक नैसर्गिक साहित्याचा वापर करत अत्यंत कमी खर्चातील 'इको फ्रेंडली वॉटर फिल्टर'च्या प्रतिकृतीचे संशोधन केले आहे. या संशोधनाचे भारतीय पातळीवरील पेटंटही प्राध्यापकांनी मिळविले आहे. तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. निलेश गायकवाड, प्रा. डॉ. प्रमोद जाधव, प्रा. नितीन तायडे, 'मविप्र' समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. घनश्याम जगताप, मुंबई समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. संदेश बल्लाळ यांनी पारंपरिक प्युरिफायरमुळे आरोग्यावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन हे महत्त्वपूर्ण संशोधन केले.
पाणीटंचाई व शुद्ध पाण्याचा प्रश्न या यंत्राच्या माध्यमातून सोडविला जाऊ शकतो, असा विचार करून या पद्धतीच्या 'इको फ्रेंडली वॉटर फिल्टर'ची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या पेटंटमुळे समाजकार्य अभ्यासक्रमाला विशेष प्रसिद्धी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. भविष्यात ग्रामीण व आदिवासी भागात याचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून वसतिगृह, शैक्षणिक संस्था, आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांसाठीही ते उपलब्ध होऊ शकते, विशेष म्हणजे घरगुती स्तरावर पाण्याची शुद्धता वाढविता येणार असल्याचा विश्वास या प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे. शुद्ध जल यंत्राला नवी दिशा कामगार, गरीब, दचित व आदिवासी बांधवाना घरगुती वापरासाठी अत्यंत स्वस्त व माफक दरात फिल्टर घेता येईल. तसेच, या संशोधनामुळे घरगुती वापरासाठी शुद्ध पिण्यायोग्य पाणी कमी खर्चामध्ये सर्वांना सहज उपलब्ध होणे शक्य होणार आहे व शुद्ध जल यंत्राला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे.मुंबई तरुण भारत २०.५.२५