निसर्ग साखळीतील मधमाश्या हा अत्यंत महत्वाचा कीटक आहे. मधमाश्या परागीकरणाद्वारे पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यास मदत करतात. जैवविविधता टिकवून ठेवण्यात मधमाश्यांचे स्थान महत्वाचे आहे. त्यांच्यामुळे पर्यावरणाचे संतुलन तर टिकून राहतेच, शिवाय जगातील एक लाखांपेक्षा जास्त वनस्पतींना फलोत्पादनासाठी मधमाश्या अनिवार्य आहेत. गहू,भात,मुग,उडीद,वांगी,मिरची,वाटाणा यासारख्या २० % वनस्पती आणि पिकांचा अपवाद सोडला तर ८० % सपुष्प वनस्पतींना परपरागीभवनाची आवश्यकता असते. त्यामुळे यासाठी मधमाशीचे काम मोलाचे ठरते.
याशिवाय मधमाशीचा उपयोग मध,मेण,परागकण,मधमाशीचे विष,रॉयल जेली, प्रोपोलिस हे पदार्थ मिळण्यासाठी होतो.
परंतु मधमाश्या मनुष्यावर हल्ला करतात या भीतीने त्यांची पोळी जाळण्याचे प्रमाण तसेच त्यांना मारून टाकण्याचे प्रमाण फार मोठे आहे. आज त्यामुळे मधमाशीच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. मात्र हे योग्य नाही, याचा परिणाम असा होईल की संपूर्ण जीवसृष्टीलाच पुढे जाऊन धोका निर्माण होऊ शकेल! यामुळे लोकांनी मधमाश्यांना उगाच मारू नये. याउलट त्यांच्या डंखापासून वाचण्यासाठीचे उपाय करावेत.
मधमाश्या वाढीवर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बांधावर शिकेकाई, ब्राझील बुश,सागरगोटे,चिमट,चिल्लर अशी मधमाश्यांना पूरक अशी झाडे लावावीत. तर पडीक जमिनीत बोर,शेवगा,हादगा,चिंच,कवठ,सुबाभूळ,जांभूळ,ऐन,हिरडा,शमी,कडूनिंब, गुलमोहर अगस्त अशी झाडे लावावीत. कोथिंबीर,कारळा,मका,करडई,तीळ,फळभाज्या अशी मिश्र आणि दुबार पिके घेतल्यास मधमाश्यांच्या वसाहती वर्षभर शेती विभागात ठेवणे शक्य होईल.
संकलित