अडीच एकरात घेतले हेक्टरी ३२ क्विंटल तूर उत्पादन
वर्डी (ता. चोपड़ा, जि. जळगांव) येथील गोकूळ सदा सुलताने हे निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांनी अडीच एकर क्षेत्रात सलग तूर पिकाची टोकण २० जून २०२४ रोजी केली. ५ फूट बाय दीड फूट अंतरावर केलेल्या लागवडीसाठी ६ बॅग बियाणे लागते. पेरणीचे वेळी ५ बॅग १५:१५:१५ संयुक्त खत दिले. दोन ओळीतील ५ फुटांच्या जागेत वखराने ४ वेळा वखरणी केली. निंदणीने शेत तणमुक्त केले. शेवटच्या वखरणीवेळी दोन ओळींच्या मधोमध जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड पाहून घेतले. यामधून एकसरी आड दोन वेळा ओलित केले. पहिले ओलिव फुलोरा अवस्थेपूर्वी, तर दुसरे ओलित शेंगांमध्ये दाणे भरताना दिले. तूर कंबरेइतक्या उंचीची झाल्यावर छाटणी केली. फांद्यांच्या अवस्थेत खताचा दुसरा हप्ता (१५: १५:१५:०९-३ बंग व युरिया ३ बॅग ) दिला. तर फुलोऱ्यापूर्वी खताचा तिसरा हप्ता युरिया ३ बॅग , सिंगल सुपर फॉस्फेट ३ बॅग, दाणेदार बोरॉन व झिंक दिले. गरजेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी ४ फवारण्या केल्या.
अशा योग्य नियोजनामुळे गोकूळ सुलताने यांच्या अडीच एकरांत ३२ क्विंटल तूर उत्पादन झाले, त्याला ६५५१ रुपये दर मिळाला. त्याचे २,०९,६३२ रुपये आले, तूर कुटाराचे १३ हजार रुपये मिळाल्याने तुरीतून एकूण उत्पन्न रु. २,२२,२२७ झाली. पिकासाठी व्यवस्थापनाचा खर्च रु. ८९,८०० झाला. तो वजा जाता रु. १,३२,८३२ निव्वळ नफा मिळाला.
ही तंत्रे ठरली फायदेशीर
तिसऱ्या वखरणीनंतर तूर पिकाच्या दोन ओळीमध्ये मधोमध वखराच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घेतल्या. यामुळे तूर पीक वाटलेले असताना या दांडातून ओलीत करणे शक्य झाले. पूर्वी असे ओलित करता येत नसे. दांड पाडलेले असल्याने तुरीचे पीक गादीवाफ्यावर आले. पावसाचे अतिरिक्त पाणी नालीमध्ये उतरून जात असल्याने मर रोगाची समस्या फारशी जाणवली नाही.
कंबरेच्या उंचीला तूर आल्यानंतर मशिनद्वारे छाटणी केली, त्याला ६०० रुपये खर्च आला. त्यामुळे फांद्यांची संख्या वाढली. उत्पादकताही वाढली.
दोन झाडांतील अंतर मुबलक असल्याने तुरीचे बूड व खोड बळकट झाले. मध्यान्ही सूर्यप्रकाश बेट जमिनीपर्यंत पोहोच् लागला. हवा खेळती राहिली. परिणामी कीड, रोगाचा उपद्रव कमी राहिला, पिकाला खालीपर्यंत एकसमान सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे उत्पादकतेत वाढ होण्यास मदत झालो.
उत्पादनातील तफावत
सलग तुरीचे पीक घेण्याकडे शेतक-यांचे कल वाढतो आहे. या पिकाचा मोठा कालावधी लक्षात घेता उत्पादकता वाढीच्या मोठ्या क्षमता आहेत. अन्य शेतकरी तुरीचे एकरी ५ ते ६ क्विंटल (कोरडवाहू) तर ७ ते ८ क्विंटल (ओलिताखाली) मिळवितात. कमी खर्चाच्या व योग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून गोकूळ सुलताने यांना एकरी १२.८ क्विंटल तूर उत्पादन मिळाले. एकरी ५ क्विंटल म्हणजेच ६५५१ रुपये दराप्रमाणे ३२,७५५ रुपये उत्पन्न अधिक मिळवणे शक्य झाले. मागील वर्षाप्रमाणे दर मिळाला असता तर नफ्याचे प्रमाण आणखी वाढले असते.
तुरीच्या व्यवस्थापनात कमी खर्चाच्या तंत्रज्ञानासाठी अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांची मोबाइलद्वारे मदत घेतली. त्यांच्याशी पेरणीच्या आधीपासूनच संपर्क झाला असता तर दोन ओळीत योग्य अंतर ठेवता आले असते. सुलताने यांचे तुरीचे पीक जास्त दाटल्यामुळे एकसरी आड पाणी द्यावे लागले. पुढील हंगामात दोन ओळींतील अंतर ७ फुटांपर्यंत व दोन झाडांमधील अंतर अर्धा ते पाऊण फूट राखण्याचा विचार आहे. त्यामुळे उत्पादकता नक्की वाढेल, असे गोकूळ सुलताने यांनी सांगितले.
गोकूळ सुलताने ९६५७९०३७७३
३० एप्रिल २०२५......Agrowon