तूर उत्पादनाचे तंत्र - भाग 2

Vartapatra    02-May-2025
Total Views |

sanskrutik vartapatra krushi_12low-cost-easy-techniques-for-increasing-tur-dal-production.jpg
 
कमी खर्चाचे, सोपे तंत्र वाढविते तुरीचे उत्पादन
सोयाबीन आणि तूर या आंतरपीक पद्धतीमध्ये तुरीकडे तुलनेने दुर्लक्ष होते. त्याची योग्य अंतरावर पेरणी, विरळणी, छाटणी यांसह अनेक कामे वेळच्या वेळी होत नाहीत. त्यातून उत्पादनामध्ये आणि एकूण उत्पन्नामध्ये घट येते. हे लक्षात घेता कमीत कमी खर्चामध्ये या पिकांचे नियोजन केल्यास फायदा नक्कीच वाढू शकेल.
सलग तूर पीक घेण्याचे प्रमाण फारच अल्प आहे. सामान्यतः सोयाबीन दूर हे आंतरपीक घेतले जाते. त्यात सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक (साधारणतः १०० दिवस) आहे, तर तूर पीक ७ ते ८ महिने शेतात उभे असते. पुढील काळामध्ये तूर पिकाकडे दुर्लक्ष होते. या पिकाची लागवडही सोयाबीनच्या ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने केली जाते. त्यामुळे सोयाबीनच्या दोन झाडांतील अंतर ५ सेंमी राखले जाते. त्याच वेळी तुरीचे बियाणेही याव अंतरावर पडते. खरेतर तुरीसाठी ते अंतर कमीत कमी १५ ते २० सेंमी असावयास हवे.
यावर उपाय -
१. खुरपणी करते वेळी तूर पिकाची विरळणी करणे गरजेचे असते. किंवा
२. पेरणीयंत्राच्या कप्यात तूर बियाण्यांसोबत १:१ प्रमाणात थोडी जाडसर रेती भरावी. त्यामुळे तूर बियाण्यातील अंतर वाढण्यास मदत होईत अथवा
३. पेरणीचे वेळी तूर बियाणे (एकरी २.५ ते ३.० किलो) कमी वापरावे.
या समस्या कमी करण्यासाठी तूर पिकाला मुख्य पिकाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी पुढील उपाय करता येतील.
उपाय १: सामान्यतः सोयाबीन तूर यांची ६०१ पद्धतीमध्ये पेरणी केली जाते. त्यात सोयाबीन पिक दाटल्यामुळे तेव क्रया उंचीपर्यंत तुरीच्या खालील फांद्या वाळतात, सुकतात, त्यातील सोयाबीनची तुरीजवळची एकेक ओळ कमी करता आल्यास तूर पिकाला फायदा होऊ शकेल. त्यासाठी पेरणीयंत्रातील सोयाबीनच्या बियाणे टप्प्यातील अलीकडची तिसरी व पलीकडची तिसरी नळी टिकली लावून बंद केल्यास हे साधता येईल, यामुळे ४ ओळी सोयाबीन- रिकामी ओळ- तुरीची ओळ- रिकामी ओळ पुन्हा ४ ओळी सोयाबीन अशी पेरणी शेतात होईल,
उपाय २: ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणी यंत्राच्या दात्यांमध्ये (फण्यांमध्ये) थोडा फेरबदल करता येईल. यासाठी मधले चार नंबरचे दाते (फणे) तसेच ठेवून पेरणी यंत्राचे अलीकडील तीन दाते व पलीकडचे तीन दाते यामधील अंतर कमी करून घ्यावे.
या दोन्ही उपायांमध्ये या रिकाम्या ओळीच्या जागी डवरणीच्या (कोळपणी) वेळी जानोल्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घ्याव्यात. त्यामुळे तुरीची एक ओळ वरंबावर येईल व सोयाबीनच्या चार ओळी गादीवाफ्यावर येतील.

जितेंद्र दुर्गे ९४०३००६०६७
सहयोगी प्राध्यापक ,श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती
३० एप्रिल २०२५...... Agrowon