सामान्य मच्छीमार बांधव आणि महिलांचे संघटन यातून साध्य झालेली यशोगाथा - भाग ४

Vartapatra    14-May-2025
Total Views |

 
sanskrutik vartapatra krushi_17

 

ही सर्व तयारी झाल्यावर तलावांमध्ये स्थानिक माशांचीच पैदास होईल हे आवर्जून पाहिले गेले. हे करताना स्थानिक माशांच्या मिळालेल्या एकूण प्रजाती ४९ इतक्या होत्या. या स्थानिक प्रजातींव्यतिरिक्त बाहेरील माशांचे बीज तलावात सोडणे पूर्णपणे टाळले. पहिल्या तलावात आठ महिन्यांतच अपेक्षित बदल दिसू लागले. मासे संख्येने व आकाराने वाढू लागले. याचे कारण वनस्पतीच्या रूपात त्यांचे खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध होत होते.

हे यश मिळूनही मच्छीमार सोसायटीमध्ये महिलांच्या समावेशाची सक्ती केली. त्यांचे आता प्रत्येक कामावर लक्ष राहू लागले, बेशरमची झाडे दिसताच काढून जाळली जाऊ लागली. तलावात विविध झाडांची लागवड केली गेली. चक्क छातीभर पाण्यात उभे राहून मासेमारी महिला करू लागल्या, तलावावरील सर्व कामांमध्ये महिला बचत गट पुढे सरसावले, ४३ खेडयांत ६३ तलाव होते. त्यापैकी ३२ तलावांत बारमाही पाणी, तर ३१ तलावांत आठ नऊ महिने पाणी राहते. या सर्व गावांमध्ये मिळून बारा मच्छीमार सोसायट्या होत्या. सहा वर्षांत या गटांनी ११ तलाव पुनरुज्जीवित केले. पुढे हळूहळू तलावात विविध ठिकाणी माशांच्या प्रजातींना अनुकूल अशी आश्रयस्थाने निर्माण केली गेली. अशा प्रयत्नातून स्थानिक माशांची पैदास दोन ते बारा पटींनी वाढली. पूर्वी जे मासे २०० ते ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वाढत नव्हते, त्यातील एकेक मासा आता एक किलोपेक्षा अधिक वजनाचा मिळू लागला.

पुढील दोन-तीन वर्षांतच महिला गटांनी पाणवनस्पतींची बीज बँक सुरू केली. माशांची नवी बाजारपेठ, नवे पदार्थ, दीर्घकाळ टिकणारे प्रक्रिया पदार्थ तयार केले जाऊ लागले. त्यातही 'माशांचे लोणचे' सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यासाठी नव्या बाजारपेठांचा शोध सुरू झाला. (समाप्त)

ॲग्रोवन ९.५.२५

सतीश खाडे, ९८२३०३०२१८, 'अभिनव जलनायक' या पुस्तकाचे लेखक