'सूत्रां'ना दिसलेली लढाई - भाग १

Vartapatra    14-May-2025
Total Views |

indias-response-to-pahalgam-attack-media-misinformation
 
पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाम येथे घेण्यासाठी भारतीय सेनादलांनी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील काही ठिकाणी हल्ला केला. ही ठिकाणे निवडताना भारतीय सेनेने कोणत्याही निरपराध नागरिकाला तसेच पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठाण्याला धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देणे, त्यांचे तेथील तळ उखडून टाकणे हाच या कारवाईचा हेतू होता. आपल्या निरपराध नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार भारताने वापरला. या हल्ल्याची माहिती देताना भारताच्या परराष्ट्र सचिवांनी सातत्याने, 'हे प्रत्युत्तर असून पाकिस्तानवर हल्ला करण्याचा भारताचा कोणताही हेतू नाही,' असे स्पष्ट केले होते. या घटनेला आता दोन दिवस होऊन गेले आहेत.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने भारतातील अनेक शहरांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांचा प्रयत्न केला. ते निष्प्रभ ठरवून भारताने आपले लष्करी सामर्थ्य दाखवून दिले. त्याही वेळेस भारताची भूमिका अतिशय संयमित होती. 'आमच्या नागरिकांची कुरापत कोणी काढणार असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही' असा स्पष्ट संदेश भारताला द्यायचा होता. पहलगामच्या घटनेनंतर ही कारवाई करण्यासाठी भारताने साधारण पंधरा दिवस घेतले. त्यात या कारवाईचे नियोजन करतानाच विविध देशांना आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठीही प्रचंड प्रयत्न करण्यात आले. अमेरिकेपासून सौदी अरेबियापर्यंत अनेक देशांनी भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला, हे त्यांचे यश. कारवाईआधी व नंतरही केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांनी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही सल्लामसलत करून त्यांना विश्वासात घेतले होते. साहजिकच सर्व विरोधी राजकीय पक्ष सरकारच्या भूमिकेला एकमुखी पाठिंबा देताना दिसले. कोणत्याही अडचणीच्या वेळेस सारे भारतीय एकत्र येऊन संकटाचा मुकाबला करू शकतात, याची ग्वाही देणारे हे चित्र होते. हे होत असताना भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषद घेत, अतिशय सम्यकपणे या सर्व घटनांची माहिती माध्यमांना दिली.

हे सगळे होत असताना गुरुवारी रात्री भारतातील विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या बातम्या मात्र अतिशय गोंधळात टाकणाऱ्या होत्या. सगळ्या वाहिन्यांनी पाकिस्तानमधील एका शहरावर भारताने हल्ला केल्याचे वृत्त दिले. वास्तविक भारताने पाकिस्तानमधील कोणत्याही शहरावर हल्ला केलेला नव्हता. पण देशातील वृत्तवाहिन्यांनी मात्र पाकव्याप्त काश्मीरपासून ते कराचीपर्यंत, पाकिस्तानातील सर्वच शहरांवर भारतीय लष्कराने कारवाई केली असल्याचे सांगायला सुरुवात केली. यात कहर म्हणजे, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही स्फोट झाले असून भारतीय सेनेने अज्ञात ठिकाणी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याचे वृत्तही दाखविले गेले. हे धक्कादायक होते. भारतीय वृत्तवाहिन्यांनी घातलेला हा गोंधळ कशाच्या आधारावर होता, हे सांगण्याचे कष्ट कोणीच घेतले नाहीत. 'सूत्रांनी' दिलेल्या माहितीच्या आधारावर हे सगळे चालले होते. ही 'सूत्रे' नक्की कोठे होती, काय करत होती? त्याचप्रमाणे भारताने शुक्रवारी सायंकाळी केलेल्या खुलाशानंतरही आपण नक्की कोणत्या आधारे या बातम्या देत होतो, याचा खुलासा करण्याची गरज यांच्यापैकी कोणालाच वाटली नाही. एकूणच वाहिन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा सगळा प्रकार होता.


अर्थात वाहिन्यांचा हा अतिरेकी उत्साह नवीन नाही. करोनाच्या काळातही असलेच वार्तांकन करून जनसमुदायामध्ये घबराट पसरविण्याचे काम काही वाहिन्यांनी केले होते. 'करोनाचा विषाणू हा वर्तमानपत्रांच्या कागदातूनही पसरतो,' असा शोध लावण्यामध्ये काही वाहिन्या आघाडीवर होत्या. हा विषाणू मारण्यासाठी अनेक अशास्त्रीय उपायांची भलामण करण्याचा प्रयत्नही या वाहिन्या करीत होत्या. एखादी बातमी दाखविल्यानंतर काही वेळानंतर सोयीने ती काढून टाकण्याची संधी या वाहिन्यांना मिळते. पण अशा बेजबाबदार वार्तांकनाने संपूर्ण समाजाचे व देशाचे आपण किती मोठे नुकसान करतो आहोत, याचे भानही त्यांना ठेवावेसे वाटत नाही..

क्रमशः

महाराष्ट्र टाईम्स १०/५/२५