युद्धविरामानंतर भारताच्या जनतेशी प्रथमच संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्याच्या दिलेल्या धमक्यांना आणि त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नांना भारत भीक घालत नाही. भारताने पाकिस्तानविरोधात केलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई तात्पुरती स्थगित केलेली असली तरी पाकिस्तान आता कसा वागतो यावर पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
यापुढे पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर यावरच होईल असा ठाम संदेश पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिला. तर दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी शक्य नाही, दहशतवाद आणि व्यापार सोबत होऊ शकत नाही आणि पाणी तसेच रक्त सोबत वाहणार नाही असे थेट इशारे पंतप्रधानांनी पाकिस्तानला तसेच संपूर्ण जगाला दिले. जगाने टेरर विरोधात झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारावे असेही ते म्हणाले.
जर पाकिस्तान सुधारला नाही तर तो स्वतःच स्वतःचा नाश करून घेईल अशी स्पष्ट शब्दांत पंतप्रधानांनी पाकिस्तानची कानउघाडणी केली.
लोकमत १३.५.२५