सामान्य मच्छीमार बांधव आणि महिलांचे संघटन यातून साध्य झालेली यशोगाथा - भाग ३

Vartapatra    13-May-2025
Total Views |

 
sanskrutik vartapatra krushi_16

 
मनीष यांचा तलाव, तलावातील पाण्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने व्यवस्थापन याविषयी थोडाफार अभ्यास आधीच झालेला होता. त्यासंदर्भात छोटीमोठी कामे करताना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी ते विविध तज्ज्ञांच्या संपर्कात होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी व पुणे येथील विजय परांजपे यांनी तलावांचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकसमूहांच्या प्रमुखांचे पाच दिवसांचे संमेलनही नवेगावबांध येथे भरवले होते. त्यामुळे हे सर्व लोक एकमेकांच्या संपर्कात येण्यासोबतच माहितीची, समस्यांची आदान प्रदान झाली होती. त्यातून एक मुख्य गोष्ट जाणवली, ती म्हणजे प्रत्येक प्रदेशातलाच नव्हे तर भागातला तलाव हा वेगवेगळा आहे. तेथील जैवविविधता विशेषतः मासे, इतर प्राणी, वनस्पती यांच्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत. तिथल्या अन्नसाखळ्यांचे मनोरे वेगवेगळ्या प्रजातींनी भरलेले आहेत.

आता नव्याने काम सुरू करताना सर्वप्रथम त्यांनी भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांतील तलावातील विविध प्रजातींबद्दल माहिती गोळा करणे सुरू केले. त्यासाठी प्राणी आणि वनस्पतीशास्त्रांच्या प्राध्यापकांची मदत घेतली. मात्र काही मोजके अपवाद वगळता पुस्तकी ज्ञानाने परिपूर्ण असलेली ही मंडळी प्रत्यक्षात अडखळू लागली. मग त्यांनी मच्छीमारी समाजातील अनुभवी व जाणकारांशीच संवाद सुरू केला. त्यातून स्थानिक भाषेत असली तरी अत्यंत मोलाची माहिती मिळू लागली. मच्छीमारांच्या प्रथा व परंपरा यात बरेच ज्ञान दडलेले असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी दिलेल्या माहितीचा, त्यांच्या परंपरांचा योग्य वैज्ञानिक अर्थ लावत काम केल्यास पर्यावरण व अन्नसाखळ्यांचे उत्तम संवर्धन होऊ शकते हे स्पष्ट होऊ लागले. त्यातूनच माशांची पैदास व उत्पादन वाढून मच्छीमारांनाही चांगले उत्पन्न मिळू शकते, अशी मनीष व त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री पटली.

स्थानिक हुशार व अनुभवी मच्छीमारांना सोबत घेत सर्वप्रथम तलावातल्या मातीचा अभ्यास केला. तसेच या तलावांमध्ये पूर्वी कोणती झाडेझुडपे आणि वनस्पती होत्या, त्याचे साधारण फायदे लक्षात घेत त्यांचे तलावामध्ये संवर्धन करण्यासाठी काम सुरू केले. पहिल्या वर्षी चार तलावात काम सुरू केले. जिल्ह्यातल्या ठिकठिकाणच्या तलावात वाढणाऱ्या आणि माशांना आश्रय, खाद्य देऊ शकणाऱ्या सुमारे १६ वनस्पती प्रजाती मिळवल्या. त्यापैकी ९ पावसाळ्याच्या तोंडावर तलावात लावण्यात आल्या. यात काही पाण्याबाहेर वाढणाऱ्या, काही पाण्यात अर्धवट बुडालेल्या, तर काही पूर्ण पाण्याखाली वाढणाऱ्या वनस्पती (झाडंझुडपं ! गवतं) यांचा समावेश होता. पहिले दोन ते अडीच महिने आवश्यक ती काळजी घेतली गेली. गाळ काढतानाच तलावातील बेशरमची झाडे मुळासकट काढून टाकली. ही झाडे सर्वच सजीवांसाठी विषारी असल्याने ती बाजूला वाळवून जाळून टाकली. मुळे व बुडखे निघत नसलेली झाडे जागेवर जाळूनच नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. (क्रमश:)

 

ॲग्रोवन ९.५.२५

सतीश खाडे, ९८२३०३०२१८, 'अभिनव जलनायक' या पुस्तकाचे लेखक