सामान्य मच्छीमार बांधव आणि महिलांचे संघटन वाढवत त्यांच्या क्षमता वाढीवर फीड या संस्थेने भर दिला. त्यामुळे तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाने वेग घेतला. चार तलावापासून सुरु झालेले काम ४५ तलावांच्या पुनरुज्जीवनापर्यंत पोहोचले स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ झाली. स्थानिक पर्यावरण संरक्षणाबरोबर जैवविविधतेत वाढ झाली.
मनीष राजनकरांच्या फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट' (फीड) या संस्थेने स्थानिक मच्छीमारांना तलाव जपणे कसे महत्त्वाचे आहे, हे समजावण्यावर पहिल्या टप्प्यामध्ये भर दिला. मच्छीमार सोसायटीच्या सदस्यांना तलाव जगण्यासाठी, कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी कोणकोणती कामे करण्याची गरज असते, याचे प्रशिक्षण सुरू केले. तलावातील गाळ काढणे, बेशरमसारख्या वनस्पती काढणे, मत्स्यबीज देऊन त्या माशांची सर्वांगीण माहिती देणे अशी कामे का गरजेची असतात, यावर भर देण्यात आला. या कामांबरोबरच यासंबंधित कायदे, नियम, हक्क, अधिकार, जबाबदारी याविषयी प्रशिक्षण घेण्यात आले. एक वर्ष सतत धडपड करूनही फारशी प्रगती दिसत नव्हती.
खरेतर तलाव, तलावातील मासे हे या लोकांचे जगण्याचे आणि हक्काचे साधन होते. पण लोकांच्या उदासीनतेमागे, दारिद्र्यामागे असलेल्या कारणांचा शोध सुरू केला. शासकीय विभागातील लोकांशी बोलताना त्यांच्या मते मच्छीमारांचे अज्ञान, निष्काळजीपणा व व्यसनाधीनता ही प्रमुख कारणे जाणवत होती. स्वतःच्या हक्काविषयी जागरूक आणि लढणारे नेतृत्वही नव्हते. तथाकथित नेतृत्व हे स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यापलीकडे जात नव्हते. आणखी एक मुख्य डाचणारा मुद्दा म्हणजे यात महिलांना काहीही स्थान नव्हते. अर्थात मासेमारी हे महिलांचे कामच नाही असा आजवर समज दृढ होता. या वर्षभरात मच्छीमाराच्या कुटुंब आणि महिलांशी ही काही प्रमाणात संवाद होत होता. यातून 'फीड' संस्थेने निर्णय घेऊन मच्छीमार सोसायटीमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व सक्तीचे केले. महिलांना मच्छीमारी संबंधित सर्व प्रकारचे ज्ञान आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. (क्रमश:)
ॲग्रोवन ९.५.२५
सतीश खाडे, ९८२३०३०२१८, 'अभिनव जलनायक' या पुस्तकाचे लेखक