पुणे- भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्याने (जीएसएलव्ही एफ १५) एनव्हीएस ०२ या अद्ययावत उपग्रहाचे बुधवारी यशस्वी प्रक्षेपण झाले. याबरोबरच श्रीहरिकोटाच्या ‘सतीश धवन अवकाश केंद्रा’वरील रॉकेटच्या उड्डाणांचे शतक पूर्ण झाले. उड्डाणांच्या पहिल्या शतकाला ४५ वर्षे लागली असली, तरी मोहिमांचा सध्याचा वेग पाहता पुढील शतक कमी कालावधीत पूर्ण होईल, असा विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
केरळच्या थुंबा येथील प्रक्षेपण केंद्रापाठोपाठ इस्रोने १९७१ मध्ये आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा या बेटावर दुसऱ्या प्रक्षेपण केंद्राची निर्मिती केली. या केंद्रावरून १० ऑगस्ट १९७९ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पहिले 'एलएलव्ही ३' हे रॉकेट झेपावले. श्रीहरिकोटा येथे रॉकेटचे पहिले लॉंच पॅड १९९३ मध्ये, तर दुसरे २००४ मध्ये उभारण्यात आले. सन २००२ मध्ये या केंद्राचे नामकरण ‘सतीश धवन अवकाश केंद्र’ असे करण्यात आले.
महाराष्ट्र टाईम्स, ३०.१.२५